राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण   

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा रविवारी दिमाखात उभा राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचे काल अनावरण करण्यात आले.राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा यापूर्वीचा पुतळा कोसळला होता. त्यामुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. 
 
यानंतर सरकारने पहिल्यापेक्षा उत्तम आणि दिमाखदार पुतळा उभारण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार काल पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वादळ आणि वार्‍याच्या वातावरणात महाराजांचा पुतळा १०० वर्षे  टिकेल, वादळाच्या तीव्रतेचा अभ्यास करुन तो तयार केला आहे.  महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. त्याच तेजाने आणि स्वाभिमाने हा पुतळा उभा झाला. विक्रमी वेळेत पुतळा पुन्हा वेळेत केल्याबद्दल मी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन करतो. शिवेंद्रराजे भोसले आणि रवींद्र चव्हाण यांच्या काळात काम वेगाने झाले. शिल्पकार सुतार साहेबांनी उत्तम पुतळा तयार केला. 

देशातील सर्वात उंच पुतळा

आयआयटीचे अभियंते आणि जे.जे महाविद्यालयातील शिल्पकार पुतळा घडवताना सोबत होते. सुमारे ९३ फुट उंचीचा हा पुतळा असून १० फुटाचा चबुतरा आहे. देशातील सर्वात उंच पुतळा आहे. पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी पुढील १० वर्षांसाठी कंत्राटदार यांच्याकडेच असेल.

वादळातही पुतळा टिकेल : शिल्पकार सुतार

पुतळा कोसळल्यानंतर नेमका तो का पडला असेल याची कारणे शोधली आणि त्यानंतर पुतळ्याची उभारणी केल्याचे शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितले. या पूर्वी पुतळ्यात फक्तलोखंडाचा वापर केला होता. त्यामुळे त्याला ३-४ महिन्यांत जंग लागला. आता पुतळ्यात ब्रॉन्झ, झिंकसारख्या धातूंचा वापर केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची निर्मिती करताना हेच धातू वापरत आहोत. एकूण पुतळा दीर्घकाळ हा टिकावा, असे नियोजन केले आहे. दुसरीकडे चक्रीवादळात  पुतळा टिकणार आहे, असे  अनिल सुतार यांनी सांगितले दरम्यान, महाराजांच्या पुतळ्याची उंची ६० फुट आहे, एकूण पुतळ्याची उंची तलवारीपर्यंत ९३ फूट आहे. सोबतच, चबुतरा १० फुटाचा आहे, असेही त्यांनी म्हटले.
 

Related Articles